लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   घर शिष्य
WFTW Body: 

“तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्याप्रकारे तुम्ही दोष काढाल, त्याचप्रकारेच तुमचेही दोष काढण्यात येतील; आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हालाही मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?

तू आपल्या भावाला, ‘मला तुझ्या डोळ्यातील कुसळ काढू दे,’ असे कसे म्हणू शकतोस, आणि पाहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे? अरे ढोंगी माणसा, आधी स्वतःच्या डोळ्यातील मुसळ काढ, म्हणजे मग तुला आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढायला स्पष्ट दिसेल" (मत्तय ७:१-५).
आपण नेहमी स्वतःचाच न्याय करावा आणि इतरांचा कधीही न्याय करू नये, याची आपल्या सर्वांना सतत आठवण करून देण्याची गरज आहे.

आपल्या सर्वांमध्ये विवेकबुद्धी असली पाहिजे - पण विवेकबुद्धी हा एक आध्यात्मिक गुण आहे, जो इतरांचा न्याय करण्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, कारण न्याय करणे ही एक शारीरिक कृती आहे.

रोमकरांस पत्र १४ हा एक असा अध्याय आहे ज्यावर आपण सर्वांनी वारंवार मनन केले पाहिजे - जेणेकरून देव आपल्या मुलांना अनेक क्षेत्रांमध्ये देत असलेल्या स्वातंत्र्याची आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण होईल.

येथे काही उदाहरणे दिली आहेत, जिथे आपण बाह्यतः किंवा आंतरिकरित्या इतरांचा न्याय करत असतो. अशा बाबींमध्ये आपण इतरांविषयी मते व्यक्त करू नयेत (किंवा आपल्या मनातही मते बाळगू नयेत):

- एखाद्या व्यक्तीकडे गाडी (किंवा दोन गाड्या!) असावी की नाही - किंवा ती कोणत्या कंपनीची असावी.
- एखाद्याचे घर किती मोठे किंवा भव्य नसावे.
- एखाद्याच्या घरात महागडी उपकरणे असावीत की नाही.
- एखाद्याने आपल्या मुलांना कोणत्या स्तराचे शिक्षण द्यावे.
- जास्त पगारासाठी कोणी दुसरीकडे जाऊ शकते की नाही, किंवा दुसऱ्या देशात स्थलांतर करू शकते की नाही.
- एखाद्याकडे किती मालमत्ता असावी किंवा त्याच्या बँक खात्यात किती बचत असावी (टीप: आपण स्वतःसाठी संपत्ती साठवू नये (मत्तय ६:१९); परंतु आपल्याला आपल्या मुलांसाठी बचत करण्याची आज्ञा आहे (करिंथकरांस दुसरे पत्र १२:१४; तिमथ्याला पहिले पत्र ५:८)).
- कोणी महागड्या हॉटेल्स/रेस्टॉरंट्समध्ये राहू (किंवा जेवू) शकते का.
- एखादी बहीण, दागिने, किंवा महागड्या साड्या/पोशाख घालू शकते का ('महाग ' म्हणजे काय हे कोण ठरवणार??), किंवा सलवार-कमीज, किंवा स्त्रियांची पॅन्ट घालू शकते का. (पवित्र शास्त्र स्त्रियांना शालीन पोशाख घालण्याची आज्ञा देते - आणि म्हणूनच आपण बहिणींना अंगप्रदर्शन करणारे, घट्ट बसणारे, उत्तेजक पोशाख घालण्यापासून सावध केले पाहिजे).
- पुरुष लांब केस ठेवू शकतात का. ( नैसर्गिक रित्या 'लहान केस' , पण देवाने याबद्दल काहीही सांगितलेले नाही- करिंथकरांस पहिले पत्र - ११:१४. आणि केसांची लांबी किती, 'लांब ' किंवा 'लहान ' आहे हे कोण ठरवणार).
- स्त्रिया लहान केस ठेवू शकतात का. (लांब केस हे तिचे वैभव आहे, पण देवाने याची आज्ञा दिलेली नाही – करिंथकरांस पहिले पत्र - ११:१५. आणि केसांची किती लांबी 'लहान' किंवा 'लांब' आहे हे कोण ठरवणार).
- कोणी आपले केस रंगवू शकते का.
- एखादी बहीण कोणत्याही प्रकारचा मेकअप करू शकते का.
- कोणी टीव्हीवर खेळ पाहू शकतो की नाही (अति प्रमाणात पाहिल्याने व्यक्तीच्या प्रभूस अनुसरून चालण्यात अडथळा येतो, कारण खेळ खूप सहजपणे एक मूर्ती बनतो - आणि आपण लोकांना याबद्दल सावध केले पाहिजे).
- एखाद्याकडे टीव्ही असू शकतो की नाही (तो काय पाहतो हा मुद्दा आहे).
- विवाहसोबती निवडताना कोणी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरांचा विचार करू शकतो की नाही. [टीप: सर्व क्षेत्रांमध्ये (आत्मा, मन आणि शरीर) "समान जोखड" असणे आवश्यक असल्याने, सुज्ञ विश्वासणारे या "आत्मिक" घटकांचाही विचार करतील.]
- एखाद्याचे लग्न खूपच भव्य आणि दिमाखदार होते की नाही.
- इत्यादी, इत्यादी,

ही केवळ काही क्षेत्रे आहेत. मला खात्री आहे की अशी इतरही अनेक क्षेत्रे आहेत. यापैकी बरेच निर्णय प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्नावर अवलंबून असतात - आणि विश्वासणाऱ्यांमध्ये उत्पन्नात बरीच तफावत असते. मोठ्या शहरातील एक अगदी साधी गाडी, घर, शिक्षण, नोकरी किंवा लग्न हे गरीब गावात राहणाऱ्यांच्या मानकांनुसार उधळपट्टीचे आणि आलिशान मानले जाईल. म्हणून, आपण एकमेकांचा न्याय करू शकत नाही.

लग्नाचा थाट दोन्ही बाजूंच्या पालकांच्या संपत्तीवर तसेच त्यांच्या पूर्ण मनाच्या तयारीवर अवलंबून असतो. एका अर्धवट मनाच्या पालकाचे किंवा वर-वधूचे मतसुद्धा या बाबतीत शांततेसाठी, अंतिम निर्णयावर प्रभाव टाकू शकते. म्हणून, कोणी लग्न कसे आयोजित करतो यावरून आपण कोणाचाही न्याय करू नये.
आपण इतरांच्या ऐषारामाचा न्याय फक्त त्याच बाबतीत करतो, जिथे आपण स्वतः साधे असतो. जे लोक वरीलपैकी एखाद्या क्षेत्रात इतरांचा न्याय करतात, ते अनेकदा स्वतःच इतर क्षेत्रांपैकी एखाद्या क्षेत्रात कमी पडतात - परंतु त्यांच्या न्यायनिवाडा करण्याच्या वृत्तीमुळे ते आंधळे होतात, त्यामुळे त्यांना स्वतःच्या उणिवा त्यांना दिसत नाहीत. म्हणून, इतरांच्या डोळ्यांतील कुसळाचा न्याय करणे टाळणेच उत्तम.

आपण "आपल्या कामाशी काम ठेवण्यास" शिकले पाहिजे आणि अशा बाबतीत इतरांनी काय करावे हे सांगणे टाळले पाहिजे. नाहीतर, आपण स्वतःला नीतिमान समजणारे परुशी बनू, जे "इतरांच्या कामात ढवळाढवळ करणारे" असतात (१ले पेत्र ४:१५). प्रत्येक व्यक्तीला त्याच्या/तिच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार वागू देणेच उत्तम.

मंडळीमध्ये, आपण प्रामुख्याने पापाविरुद्ध आणि पैशाच्या लोभाविरुद्ध बोलले पाहिजे; आणि जेव्हा कोणी आपल्याला सल्ला विचारेल तेव्हाच आपण तो दिला पाहिजे, अर्थातच, जर ती मंडळीवर परिणाम करणारी उघडपणे पापी वर्तनाची बाब असेल तर गोष्ट वेगळी.

मात्र, आर्थिक बाबतीत आपण सर्व विश्वासणाऱ्यांना त्यांच्या आर्थिक मर्यादांमध्ये राहण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. कर्ज घेणे म्हणजे देवाने आपल्या सभोवती बांधलेली आर्थिक भिंत तोडण्यासारखे आहे. उपदेशक १०:८ब पाहा. [तिथे "सर्पदंश" यासाठी वापरलेला हिब्रू शब्द "नशक" आहे, जो "कर्ज" या अर्थाच्या हिब्रू शब्द "नशा" शी खूप मिळताजुळता आहे.] आपण विश्वासणाऱ्यांना शक्यतोवर कर्ज घेणे टाळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, मात्र जिथे ते टाळता येत नाही (जसे की आपत्कालीन परिस्थिती आणि वैद्यकीय उपचारांसाठी, किंवा घर विकत घेताना/बांधताना किंवा वाहन खरेदी करताना, इत्यादी) तिथे कर्ज घ्यावे. आणि जर त्यांनी कर्ज घेतलेच, तर त्यांना शक्य तितक्या लवकर ते फेडण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे (रोमकरांस पत्र. १३:८).

तथापि, याचा अर्थ असा नाही की पवित्र शास्त्र खालील बाबींबद्दल काय शिकवते हे आपण स्पष्टपणे शिकवू नये:

- मंडळीचे संकटकाळातून जाणे - [पहा: मंडळी आणि संकटकाळ],
- प्रार्थना करताना/भविष्यवाणी करताना स्त्रियांनी डोके झाकणे - [पहा: स्त्रियांसाठी डोके झाकणे आणि डोके झाकणे - दोन आध्यात्मिक विधाने]
- इत्यादी.,

जर काही विश्वासणाऱ्यांची या बाबींवर वेगळी मते असतील, तर आपण त्यांचा न्याय करणार नाही. परंतु पवित्र शास्त्र जे स्पष्टपणे शिकवते ते आम्ही मंडळीत शिकवतच राहू.

तीतास पत्र 2:४,५ चा विचार करा, ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे की पत्नींनी प्रामुख्याने "घरात काम करणाऱ्या" असावे. आपण हे शिकवलेच पाहिजे. परंतु पवित्र शास्त्र पत्नीला घराबाहेर काम करण्यास मनाई करत नाही. म्हणून, आपणही त्याला मनाई करू नये. अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे पत्नीला कामावर
जाणे आवश्यक बनते, कारण तिचा पती आजारी असतो, किंवा त्याला रोजगार मिळत नाही, इत्यादी. म्हणून कामावर जाणाऱ्या पत्नीचा आपण कधीही न्याय करू नये.

किंवा नाताळ आणि ईस्टरच्या उत्सवाचा विचार करा. या सणांचे मूळ मूर्तिपूजक आहे याबद्दल आपल्याला स्वतःला खात्री असू शकते. परंतु काही इतर विश्वासणारे या वस्तुस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असू शकतात.

आपण आपल्या दृढ विश्वासावर ठाम राहिले पाहिजे. परंतु जे हे दिवस साजरे करतात, त्यांचा आपण न्याय करू नये. रोमकरांस पत्र १४:४-६ मध्ये हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे.

रोमकरांस पत्र १४ मध्ये पवित्र आत्म्याने आपल्याला दिलेले स्वातंत्र्य जी कोणतीही मंडळी आपल्या सदस्यांना देत नाही, ती मंडळी कायदेशीर आहे.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की न्याय करणे हे देवाच्या वचनातील सत्यांची घोषणा करण्यापेक्षा वेगळे आहे. आपण आपल्या मंडळ्यांमध्ये देवाचा संपूर्ण उपदेश घोषित केला पाहिजे. आपल्याला "कायदेशीर" म्हटले जाईल या भीतीने आपण देवाच्या सत्याच्या कोणत्याही भागावर गप्प बसू नये. परंतु जर काही जण या गौण बाबींवर आपण जे शिकवतो ते स्वीकारत नसतील आणि आचरणात आणत नसतील, तर आपण त्यांचा न्याय करू नये. जोपर्यंत त्यांच्या कृतींचा मंडळीवर परिणाम होत नाही, तोपर्यंत आपण त्यांचा न्याय देवावर सोपवला पाहिजे.

तथापि, एक मोठा धोका हा आहे की, आपण स्वतः येशू आणि त्याच्या प्रतिरूपाशी एकरूप होण्यापेक्षा वर उल्लेखलेल्या काही गौण बाबींबद्दल अधिक उत्कट होऊ लागतो.

वर उल्लेखलेल्या गोष्टी बाह्य आहेत. परंतु देव अंतःकरणाकडे पाहतो - आणि ते आपल्याला दिसत नाही. म्हणून, आपण देवाला भिऊन राहिले पाहिजे - आणि मग आपण "आपल्या डोळ्यांनी जे पाहतो किंवा आपल्या कानांनी जे ऐकतो त्यावरून न्याय करणार नाही, तर नेहमी नीतीने न्याय करू" (यशया ११:३, ४).
जर आपण मनापासून "प्रीतीचा पाठपुरावा केला" ( करिंथकरांस पहिले पत्र १४:१) आणि आपल्या प्रभूपासून "नम्रता शिकण्याचा" मनापासून प्रयत्न केला (मत्तय ११:२९), तर आपण इतरांचा न्याय करण्याच्या या सापळ्यातून वाचू.

जगातील सर्वात आनंदी लोक ते आहेत जे नेहमी स्वतःचा न्याय करतात आणि इतरांचा कधीही न्याय करत नाहीत.