WFTW Body: 

जेव्हा आपण एखाद्या वर्षाच्या शेवटी येतो, असे काही भाऊबहीण आहेत ज्यांना असे वाटते की त्यांनी आपल्या पूर्वीच्या जीवनात काही वेळा पाप केले आहे आणि देवाच्या परिक्षेत ते अयशस्वी झाले आहेत, म्हणूनच आता ते आपल्या जीवनासाठी देवाची परिपूर्ण योजना पूर्ण करू शकत नाहीत.

या संदर्भात शास्त्रवचनांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहूया आणि आपल्या स्वतःच्या समजुतीवर किंवा आपल्या युक्तिवादावर अवलंबून राहू नये. पवित्र शास्त्र कसे सुरू होते ते प्रथम पहा. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली (उत्पत्ति १: १) जेव्हा देवाने त्यांना उत्पन्न केले तेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी परिपूर्ण असायला हवी होती. कारण त्याच्या हातून अपरिपूर्ण किंवा अपूर्ण काहीही बाहेर येऊ शकत नाही. परंतु त्याने निर्माण केलेले काही देवदूत पतन पावले. यशया १४: ११-१५ आणि यहेज्केल २८: १३-१८ मध्ये याचे वर्णन आहे. त्यानंतरच उत्पत्ति १: २ मध्ये वर्णन केलेल्या, "आकारविरहित, शून्य आणि अंधकारमय" स्थितीत पृथ्वी आली. उत्पत्ति १ मधील उर्वरित भाग वर्णन करतो की देवाने त्या आकारविरहित, शून्य आणि अंधकारमय वस्तूवर कसे कार्य केले आणि त्यातून काहीतरी इतके सुंदर कसे निर्माण केले की त्याने स्वतःच ते "फार चांगले" असल्याचे जाहीर केले (उत्पत्ति १:३१).

आम्ही उत्पत्ति १: २,३ मध्ये वाचतो की देवाचा आत्मा पृथ्वीवर तळपत राहिला होता आणि देव त्याचे वचन बोलला. यामुळेच बदल घडून आला. त्यात आज आपल्यासाठी काय संदेश आहे? आपण कितीही अपयशी ठरलो किंवा आपल्या जीवनात गोंधळ घातला असला, तरी देव अजूनही आपल्या आत्म्याच्या आणि त्याच्या वचनाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातून काहीतरी वैभवशाली बनवू शकतो. देवाने स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती केली तेव्हा त्याची एक परिपूर्ण योजना होती. पण ल्युसिफरच्या अपयशामुळे ही योजना बाजूला सारून ठेवावी लागली. पण देवाने स्वर्ग आणि पृथ्वी पुन्हा तयार केली आणि तरीही गोंधळातून काहीतरी "खूप चांगले" निर्माण केले.

आता पुढे काय घडले याचा विचार करा. मग देवाने आदाम आणि हव्वा यांना बनवले आणि पुन्हा एकदा सुरुवात केली. देवाने त्यांच्यासाठीदेखील एक परिपूर्ण योजना आखली असावी, ज्यात त्यांनी बऱ्या आणि वाईटाचे ज्ञान देणाऱ्या झाडाचे फळ खाणे समाविष्ट नव्हते. पण त्यांनी देवाची आज्ञा मोडली आणि अशा प्रकारे त्यांनी देवाची योजना निष्फळ केली. युक्तिवाद आता आपल्याला सांगेल की यापुढे ते देवाची परिपूर्ण योजना पूर्ण करू शकत नाहीत. तरीसुद्धा देवाने त्यांना सांगितले नाही की त्यांना आता त्यांचे उर्वरित आयुष्य फक्त त्याच्या दुसर्‍या उत्तम योजनेत जगावे लागेल. त्याने त्यांना उत्पत्ति ३:१५ मध्ये असे वचन दिले होते की स्त्रीची संतती सर्पाचे डोके फोडेल. ख्रिस्ताने जगाच्या पापांकरिता कालवरीवर मरण्याचे आणि सैतानावर मात करण्याबद्दलचे हे वचन होते.

आता या वस्तुस्थितीचा विचार करा आणि आपण याचे उत्तर देऊ शकता का ते पहा. ख्रिस्ताचा मृत्यू हा देवाच्या सर्व अनंत काळापासूनच्या परिपूर्ण योजनेचा एक भाग होता हे आपल्याला माहीत आहे. " जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकरा " (प्रकटीकरण १३:८). तरीही आपल्याला हेही माहीत आहे की ख्रिस्ताचा मृत्यू केवळ आदाम आणि हव्वा यांनी पाप केल्यामुळे आणि देवापुढे अपयशी ठरल्यामुळे झाला. म्हणून तार्किकदृष्ट्या आपण असे म्हणू शकतो की, ख्रिस्ताला जगाच्या पापासाठी मरायला पाठवण्याची देवाची परिपूर्ण योजना पूर्ण झाली, आदामाने पाप करूनसुद्धा नव्हे, तर आदामाने पाप केल्यामुळे! देवाने त्याची प्रीती कालवरीच्या वधस्तंभावर दाखवली हे आपल्याला कळले नसते, जर ते आदामाच्या पापासाठी नसते.

मग पवित्र शास्त्राच्या अगदी सुरुवातीच्या पानांपासूनच देव आपल्यापर्यंत काय संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे? फक्त हेच की तो अपयशी ठरलेल्या माणसाला घेऊन, त्याच्याकडून काहीतरी वैभवशाली बनवू शकतो आणि तरीही त्याला त्याच्या जीवनासाठी देवाची परिपूर्ण योजना पूर्ण करण्यास भाग पाडतो. हा देवाचा माणसाला संदेश आहे - आणि आपण तो कधीही विसरू नये: देव वारंवार अपयशी ठरलेल्या माणसाला वापरू शकतो आणि तरीही त्याला त्याची परिपूर्ण योजना पूर्ण करण्यास भाग पाडू शकतो - देवाची दुसऱ्या प्रतीची योजना नाही, तर देवाची सर्वोत्तम योजना. याचे कारण असे की, त्याला काही अविस्मरणीय धडे शिकवण्याच्या देवाच्या परिपूर्ण योजनेचा एक भाग हे अपयशही असू शकते.

तुमच्या चुका किंवा अपयश काहीही असो, तुम्ही देवापासून एक नवीन सुरुवात करू शकता. देव अजूनही आपल्या आयुष्यातून काहीतरी वैभवशाली बनवू शकतो. मग आपण "विश्वासाने सबळ होऊन देवाचे गौरव करूया" (रोम ४:२०), ज्या गोष्टी आपण आतापर्यंत अशक्य समजत होतो त्या गोष्टींसाठी येणाऱ्या काळात त्याच्यावर विश्वास ठेवूया. सर्व लोक - तरुण आणि वृद्ध - भूतकाळात कितीही अपयशी ठरले असतील, जर ते त्यांचे अपयश मान्य करतील, नम्र आणि देवावर विश्वास ठेवतील तर त्यांच्यासाठी आशा आहे. अशा प्रकारे आपण सर्व जण आपल्या अपयशातून शिकू शकतो आणि आपल्या जीवनासाठी असलेली देवाची परिपूर्ण योजना पूर्ण करू शकतो. आणि येणाऱ्या काळात, तो आपल्याला इतर लोक, ज्यांचे जीवन पूर्णपणे अपयशी ठरले, त्यांच्यामध्ये देव काय करू शकतो याची उदाहरणे म्हणून दाखवू शकतो. त्या दिवशी तो आपल्यात काय करू शकतो हे दाखवेल, " ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवून " (इफिस २:७). हालेलुया!