लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर शिष्य
WFTW Body: 

अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे आज ख्रिस्ती लोक जुन्या कराराखाली जगत आहेत; त्यांना हे कळत नाही की पेंटेकॉस्टच्या दिवशी नवा करार स्थापित झाला. हे जवळजवळ असे आहे की, भारतातील लोकांना हे माहीत नाही की आपण १९४७ मध्ये स्वतंत्र झालो. कोणी याबद्दल अनभिज्ञ असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? ख्रिस्ती लोकांनी अजूनही जुन्या कराराखाली जगणे हे तितकेच हास्यास्पद आहे.

बहुतेक ख्रिस्ती लोक अनेक क्षेत्रांमध्ये जुन्या कराराखाली जगतात. जुन्या करारात, तुम्हाला फक्त तुमच्या पापांची क्षमा मिळू शकत होती (स्तोत्र १०३); नव्या करारात, रोमकरांस पत्र ६:१४ म्हणते की पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. जेव्हा लोकांना केवळ पापांची क्षमा मिळते आणि पापावर विजय मिळत नाही, तेव्हा ते जुन्या करारात जगत असतात. जुन्या करारात, एक अशी मंडळी होती जी एक शरीर म्हणून एकत्र काम करू शकत नव्हती. जेव्हा आज एखादी मंडळी अशी असते - जेव्हा ती एक शरीर म्हणून एकत्र कार्य करू शकत नाही - तेव्हा हे सिद्ध होते की ती खरोखरच जुन्या करारातील मंडळी आहे. जेव्हा दशांशावर जोर दिला जातो, तेव्हा ते देखील जुन्या करारातीलच आहे.

आज ख्रिस्ती धर्मात दशांशावर जो जोर दिला जातो, तो पूर्णपणे जुन्या करारातील आहे, म्हणून आपल्याला नव्या करारातील दानाची तत्त्वे समजून घेणे आवश्यक आहे. नव्या करारात असा कोणताही नियम नाही की तुम्ही १०% दिलेच पाहिजे. दशांशाची आज्ञा दिल्याचा शेवटचा उल्लेख जुन्या करारातील मलाखीच्या पुस्तकात आहे. जेव्हा येशूने मत्तय २३ मध्ये याचा उल्लेख केला, तेव्हा तो अशा लोकांशी बोलत होता जे अजूनही जुन्या कराराखाली होते - म्हणजे परुशी आणि यहुदी लोक. पेंटेकॉस्टच्या दिवशी नवा करार स्थापित झाला आणि त्यानंतर ख्रिस्ती लोकांना दशांश देण्याची एकही आज्ञा नाही. दशांशाचा अजिबात उल्लेख नाही.

इब्रीकरांस पत्र या पुस्तकात अब्राहामाने मल्कीसेदेकला १०% दिल्याचा एक अस्पष्ट उल्लेख आहे, पण तो अब्राहाम पाळत असलेला नियम नव्हता. त्याला जे आवडेल ते तो देऊ शकला असता. योगायोगाने ते १०% होते, पण अब्राहाम कोणताही नियम पाळत नव्हता, आणि त्याने तसे केले नसते तरी त्याने पाप केले नसते.

नव्या करारामध्ये, दान देण्याची तत्त्वे अशी आहेत की ते गुप्तपणे (मत्तय ६:१-४), आनंदाने (करिंथकरांस दुसरे पत्र ९:७), आणि तुमच्या कमाईच्या प्रमाणात (करिंथकरांस पहिले पत्र १६:२) दिले पाहिजे. तुम्ही किती द्यावे याबद्दल कोणताही नियम नाही. देवाने तुम्हाला जसे समृद्ध केले आहे, त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. जर तुमच्याकडे भरपूर असेल आणि तुमच्याकडे देण्यासाठी खूप काही असेल, तर तुम्ही अधिक देऊ शकता; आणि जर तुमच्याकडे जास्त नसेल, तर तुम्हाला देण्याची गरज नाही. ते ठीक आहे, कारण देव अब्जाधीश आहे, आणि त्याला दान दिल्यामुळे त्याच्या कोणत्याही गरीब मुलाला त्रास व्हावा असे त्याला वाटत नाही.

जर तुम्हाला ही तत्त्वे समजली नाहीत, तर बरेच पाळक आणि उपदेशक तुमचे शोषण करतील आणि आर्थिकदृष्ट्या तुमचा गैरफायदा घेतील. पण हे लक्षात ठेवा, की जेव्हा आपण दान देतो, तेव्हा ते गुप्तपणे दिले पाहिजे. जी कोणतीही मंडळी तुम्ही काय देत आहात हे उघड करण्यास भाग पाडते, ती प्रत्यक्षात तुम्हाला मत्तय ६:१-४ मधील देवाच्या वचनाचे उल्लंघन करण्यास सांगत आहे. शक्यतोवर, आपले सर्व दान गुप्त, ऐच्छिक आणि आनंदाने केलेले असावे.

याच कारणामुळे, जे लोक आनंदाने दान करत नसतील त्यांच्यासमोर पिशवी ठेवून त्यांना देण्यास भाग पाडावे, असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. त्यांच्यासाठी गुप्तपणे दान करणे कदाचित शक्य नसेल, कारण त्यांचे शेजारी त्यांना दान करताना पाहत असतात. माझ्या मते, हे करण्याचा योग्य मार्ग म्हणजे मंडळीत कुठेतरी एक पेटी ठेवणे, जिथे लोक स्वेच्छेने, गुप्तपणे, आनंदाने आणि आपल्या क्षमतेनुसार दान करतील. परंतु फार कमी मंडळ्या ही पद्धत अवलंबतात, कारण बहुतेक ख्रिस्ती धर्मोपदेशकांमध्ये आणि बहुतेक ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये पैशाबद्दल प्रचंड प्रेम आहे.

लक्षात ठेवा, की मत्तय ५:२० सांगते -- "तुमचे नीतिमत्व परुश्यांच्या नीतिमत्वापेक्षा श्रेष्ठ असले पाहिजे" -- हे डोंगरावरील प्रवचनाच्या उर्वरित भागाचे शीर्षक असू शकते: " आपण देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपले नीतिमत्व शास्त्री व परुशी यांच्या नीतिमत्वापेक्षा कशा प्रकारे अधिक असले पाहिजे "
येशू म्हणतो की, आपल्या दान देण्याच्या बाबतीत, आपली वृत्ती परुश्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असली पाहिजे; ह्या ढोंगी लोकांना आणि परुश्यांना आपण काय देत आहोत हे लोकांना कळावे असे त्यांना वाटत असे. त्याने म्हटले की, मनुष्यांसमोर आपले नीतिमत्व प्रकट करण्यापासून सावध रहा. हेच मूलभूत तत्त्व आहे. येशूने म्हटले की, लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असे करू नका.

कधीकधी लोकांच्या या गोष्टी लक्षात येणे आपण टाळू शकत नाही, आणि जर लोकांना चुकून त्या कळल्या किंवा त्या टाळण्याचा काही मार्ग नसेल, तर आपल्याला दोषी वाटून घेण्याची गरज नाही; पण आपण या गोष्टी मनुष्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी करत नाही. हाच मुद्दा आहे. नाहीतर स्वर्गातील तुमच्या पित्याकडून तुम्हाला कोणतेही प्रतिफळ मिळणार नाही. या वचनानुसार, असे अनेक लोक आहेत ज्यांनी प्रभूच्या कार्यासाठी दान दिले आहे, पण त्यांना स्वर्गात कोणतेही प्रतिफळ मिळणार नाही, कारण त्यांनी किती दान दिले हे इतरांना कळावे अशी त्यांची इच्छा होती.

जर तुम्ही गुप्तपणे दान दिले, तर तुमचा पिता, जो गुप्तपणे पाहतो, तो तुम्हाला परतफेड करेल. देवाने वचन दिलेले हे एक अद्भुत प्रतिफळ आहे, की जर आपण येथे त्याच्या आज्ञेचे पालन केले, तर एके दिवशी, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा ज्यांनी त्यागपूर्वक आणि गुप्तपणे दान दिले आहे, त्यांना मोठे प्रतिफळ मिळेल.