आपल्या आठवणींची व्हिडिओ —टेप

Article Body: 

व्हिडिओ कॅमेर्‍याच्या सहाय्याने आता आपण आपल्या अवतीभोवती जी दृश्ये पाहतो, ती चित्रित करणे आणि जे ध्वनि ऐकतो, ते जसेच्या तसे मुद्रित करणे शक्य झाले आहे. नंतर ही व्हिडिओ-टेप जेव्हा पडद्यावर दाखवली जाते, तेव्हा घडलेली घटना अगदी तंतोतंत जशीच्या तशी दिसते.

पवित्रशास्त्र म्हणते, असा एक दिवस येत आहे की, त्या दिवशी आपण आपला हिशेब परमेश्वराला देणार आहोत. पण मानवी इतिहासात गेल्या अनेक शतकांत जे अब्जावधी लोक पृथ्वीवर राहिजे, त्या प्रत्येकाने त्यांच्या जीवनात केलेल्या आचार, विचार, उच्चारांची नोंद करणे देवाला कसे शक्य झाले? याचा आपण विचार करतो, तेव्हा आपणांस आश्चर्य वाटते. पण देवाने ही नोंद प्रत्येक माणसाच्या आठवणीत, स्मरणात ठेवली आहे.

स्मरणशक्ती ही एखाद्या व्हिडिओ टेपसारखी आहे. आपण ज्या गोष्टी करतो, बोलतो अथवा ज्या गोष्टींचा आपण विचार करतो, त्यांची ती अगदी प्रामाणिकपणे नोंद करीत असते. स्मरणशक्ती आपल्या अंतर्यामातील प्रवृत्ती आणि हेतूंचीही नोंद ठेवीत असते. एखादा मनुष्य मरतो, तेव्हा तो त्याचे शरीर पृथ्वीवर मागे ठेवून जातो. पण त्याची स्मरणशक्ती त्याच्या आत्म्याचा एक भाग असते, म्हणून तिच्यासहीत तो मृत आत्म्यासाठी जे ठिकाण नेमले आहे तेथे जातो. शेवटी न्यायाच्या दिवशी त्याचा आत्मा पुनः त्याच्या पृथ्वीवरील पूर्वीच्या मातीच्या शरीरात येईल. त्याने पृथ्वीवर घालवलेल्या जीवनाचा हिशेब देवासमोर देण्यासाठी त्याला पुनः त्याच्या शरीरासह उठविण्यात येईल. त्या दिवशी प्रत्येकाचा न्याय होईल, तेव्हा देव सर्व जगाला दिसावे म्हणून प्रत्येकाच्या आठवणींची व्हिडिओ-टेप पडद्यावर दाखविणार आहे. त्या वेळी कोणीही पडद्यावरील दृश्याच्या खरेपणाबद्दल प्रश्न विचारणार नाही. कारण माणसाच्या जीवनातील आठवणींचाच तो चलत् चित्रपट असेल.

लोक आज जो सभ्यतेचा आणि धर्माचा बुरखा घालून मिरवितात, तो बुरखा त्या दिवशी फाडला जाईल आणि आतील खरा माणूस उघडकीस येईल. त्या दिवशी धर्म कोणालाही वाचवू शकणार नाही. कारण सर्वांनीच पाप केले आहे, हे त्या दिवशी सर्वांना कळून येईल- मग तो कोणत्या का धर्मात जन्मलेला असो अथवा कोणताही धर्म आचरीत असो ! पुण्यकर्म, गोरगरिबांना दानधर्म किंवा चर्च, मंदिर अथवा मशिदीला देणग्या दिल्यामुळे कोणाचा बचाव होणार नाही, कारण यापैकी कुठल्याही धर्मकृत्याने आपल्या पापांची नोंद पुसली जाणार नाही.

आपण केलेले दुष्ट आचार, विचार आणि उच्चार यांची व्हिडिओ-टेप न्यायाच्या दिवशी देवाने दाखवू नये, म्हणून देवाच्या दृष्टिसमोरून ती कायमची पुसून टाकण्याचा एकच एक मार्ग आहे ! आपली पुण्यकर्मे आपले दुष्ट आचार पुसून टाकू शकत नाहीत. नाही-कदापि नाही! आपली दुष्ट कर्मे पुसून टाकण्यासाठी आपण केलेल्या पापांबद्दल योग्य आणि न्याय्य अशी शिक्षा भोगावी लागते. पवित्र शास्त्रात सांगितले आहे की, दैवी नियमानुसार पापासाठी एकच एक शिक्षा आहे आणि ती म्हणजे मृत्युदंड ! आपण प्रत्येकजण आपल्या पापामुळे मृत्युदंडास पात्र झालो आहोत.

आपणांस सार्वकालिक मरणाच्या शिक्षेपासून सोडविण्यासाठी 1900 वर्षापूर्वी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त स्वर्गातून खाली पृथ्वीवर मनुष्य बनून आला आणि यरूशलेम शहराबाहेर कालवरीच्या टेकडीवरील वधस्तंभावर मरण पावला. सबंध मानवजातीच्या पातकासाठी म्हणजेच सर्व धर्माच्या लोकांच्या पातकांसाठी-असलेली दैवी शिक्षा त्याने तेथे भोगली. त्याला कबरेत पुरल्यानंतर तीन दिवसांनी तो मेलेल्या लोकांमधून उठून जीवंत होऊन बाहेर आला. त्यावरून तो खरोखर देवाचा पुत्र होता आणि मानवाचा सर्वात मोठा शत्रू जो मृत्यु त्याला त्याने जिंकले, हेच त्याने सिध्द केले. चाळीस दिवसांनंतर पुष्कळ लोकांदेखत तो स्वर्गात गेला. जाताना त्याने अभिवचन दिले की, सर्व मनुष्यांचा न्याय करण्यासाठी नेमलेल्या वेळी मी पुनः येईन. त्याने वचन देऊन आता 1950 वर्षे झाली आहेत आणि आता त्याची पृथ्वीवर परत येण्याची वेळ जवळ आली आहे. या काळात लवकरच एखादे दिवशी स्वर्गातून आकशात त्याचे पुनरागमन झाल्याचे आपण पहाणार आहोत.

इतिहासात मानव जातीच्या पापांसाठी मरणारी येशू ख्रिस्त ही एकच एक व्यक्ती आहे, तसेच मेलेल्यांमधून उठलेलाही तोच एक आहे. या दोन्ही बाबतीत तो एकमेव होता. त्याच्यासारखा दुसरा कोणी झाला नाही !

आज जर आपण प्रामाणिकपणे आपल्या पातकांबद्दल पश्चाताप केला आणि येशू ख्रिस्ताने जे बलिदान केले, त्यावर विसंबून देवाला आपल्या पापांची क्षमा करण्याची विनंती केली आणि येशू आपल्या पातकांसाठी मरण पावला व तिसर्‍या दिवशी मेलेल्यामधून पुनः उठला, असा आपण विश्वास धरला, तर आपल्या पातकांची क्षमा होईल व आपली पातके आपल्या व्हिडिओ-टेपवरून बुजवून टाकली जातील.

तुम्ही आता या क्षणी येशूला आपल्या जीवनात बोलावून आपल्या पूर्वीच्या पापी जीवनाची नोंद पुसून टाकण्याची विनंती करू शकता- मग तुमची पातके कितीही मोठी अथवा संख्येने कितीही जास्त असोत ! तद्नंतर तुम्ही देवाचे मूल बनता आणि तुमच्या पातकांची नोंद पुसून स्वच्छ केल्यामुळे, तुम्ही पुनः नवीन जीवन सुरू करू शकता.

मानवजातीसाठी देवाने नेमलेला तारणाचा हाच एक मार्ग आहे. त्याचा आताच फायदा करून घ्या. दुसर्‍या कोणत्याही पर्यायी मार्गाने तुम्ही जात असाल, तर लक्षात ठेवा, न्यायाच्या दिवशी तुमच्या आठवणींची व्हिडिओ-टेप लावून तुमच्या पातकांची नोंद तुम्हांला पहावी लागेल. हे सत्य जाणून आणि सर्व पातक्यांसाठी अग्निसरोवरात होणार्‍या सार्वकालिक शिक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन, प्रत्येकाला प्रेमाने त्याविषयी जाणीव करून देणे हे आमचे कर्तव्य आहे.

तुम्ही आता जास्त उशीर न करता आजच योग्य निर्णय घ्यावा. देव तुम्हांला तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे सार्वकालिक जीवन देऊन आशीर्वादित करो.

आम्ही अगदी मनापासून, देवापासून आलेला हा संदेश तुमच्यापर्यंत पोहचवित आहोत.

-झॅक पूनन

अधिक माहितीसाठी कृपया खालील पत्त्यावर लिहा अथवा प्रकाशकाला कळवा.